Wednesday, January 3, 2018

विवेकचूडामणि श्लोक ३ रा

श्लोक २ मध्ये सांगितलेल्या दुर्लभ गोष्टींखेरीज आणखी काही दुर्लभ गोष्टी मोक्षासाठी आवश्यक आहेत. 

दुर्लभं त्रयमेवैतद् देवानुग्रह-हेतुकम् ।
मनुष्यत्व मुमुक्षुत्व महा-पुरुष-संश्रयः ॥ ३ ॥

माणूस म्हणून जन्म, मोक्षासाठीची इच्छा आणि महापुरुषाचा आश्रय या तीनही गोष्टी दुर्लभ आहेत. (त्या मिळण्यास) देवाचा अनुग्रह हे कारण आहे.

मनुष्यजन्म दुर्लभ आहे मागे सांगून झाले आहे. तसेच ब्रह्मभाव, परमानंद आणि म्हणजे मोक्ष हे मानवी जीवनाचे ध्येय म्हणून सांगून झाले (श्लोक १ -२) पण अनेकदा माणसाला मोक्ष मिळविण्याची इच्छा होत नाही. ऐहिक ऐषआराम आणि सुखे यांत माणूस इतका दंग आणि गुंग होऊन जातो की मोक्ष हे आपले साध्य आहे हे तो विसरून जातो. म्हणून मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षप्राप्तीची इच्छा होणे हे दुर्लभ आहे असे येथे म्हटले आहे.

आता सर्व दुर्लभ गोष्टी मिळाल्या तरी मोक्ष मिळेल असे नाही. कारण त्यासाठी काय करावे लागते हे गुरूकडून जाणून घेणे आवश्यक आहे. या गुरूला येथे 'महापुरुष' असे म्हटले आहे (श्लोक ८ पहा. महापुरुष व त्याचे समानार्थी शब्द पुढे अनेकदा येतात). गुरू हा अध्यारोप आणि अपवाद या प्रक्रियांद्वारा ब्रह्माचे ज्ञान देतो आणि ब्रह्मप्राप्तीसाठी-मोक्षासाठी काय करावयास हवे हे सांगतो. असा गुरू काही वाटेवर पडलेला नाही अथवा तो दारावर पाटी लावून बसलेला नाही. तर गुरूचा शोध करून त्याचा आश्रय घेणे हे अवघड आहे.

वर उल्लेखिलेल्या तीन दुर्लभ गोष्टी देवाच्या दयेने मिळतात असे येथे सांगितलेले आहे. देवाची/ईश्वराची कृपा होण्यास त्याची पूजा, भक्ती इत्यादी आवश्यक आहेत. पण ईश्वरभक्ती ही केवलाद्वैत वेदांताच्या चार साधनांत सांगितलेली नाही. म्हणून पुढील गोष्ट लक्षात घ्यावी. केवलाद्वैत वेदांतात माया ही उपाधी असणारा ईश्वर मानलेला आहे. तो सर्वगुणसंपन्न आहे. सगुण ईश्वराचा निर्देश पहिल्या श्लोकात आहेच. या ईश्वराची कृपा कुणावर होते ? उत्तर आहे - त्याची भक्ती करणाऱ्यावर. तसेच प्राण्याच्या कर्मानुसार ईश्वर त्याला देत असतो. अशी ईश्वराची कृपा झाली तर या श्लोकात सांगितलेल्या तीन दुर्लभ गोष्टी माणसाला प्राप्त होतात.

No comments:

Post a Comment