Thursday, January 4, 2018

विवेकचूडामणि श्लोक ४ था

समजा सर्व दुर्लभ गोष्टी प्राप्त झाल्या तरी तेवढ्याने भागत नाही. माणसाने परमानंदासाठी-मोक्षासाठी प्रयत्‍न करणे आवश्यक आहे. 

लब्ध्वा कथंचित् नरजन्म दुर्लभं
    तत्रापि पुस्त्वं श्रुति-पार-दर्शनम् ।
यस्त्वात्म-मुक्तौ न यतेत मूढधीः
    स ह्यात्‍महा स्वं विनिहन्त्यसद्-ग्रहात् ॥ ४ ॥

कसेतरी का होईना दुर्लभ असा नरजन्म, पुरुष म्हणून जन्म, आणि श्रुतीचे सांगोपांग अध्ययन प्राप्त झाल्यावर, जो मूर्ख बुद्धीचा माणूस स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्‍न करणार नाही, तो स्वतःचा घात करणारा होतो, आणि चुकीच्या कल्पनेने तो स्वतःचा घात करून घेतो.

मोक्ष हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. मोक्ष म्हणजे बंधनातून सुटका. विद्यमान जीवनात माणूस अविद्येने बांधलेला आहे (श्लोक ५२); तो अविद्या, काम आणि कर्म या पाशांनी बद्ध आहे (श्लोक ५७). या बंधनातून माणसाने आपली सुटका करून घ्यावयाची आहे. तेव्हा शहाण्या माणसाने बंधनातून सुटण्याचा प्रयत्‍न करावयास हवा. तसे न करणाऱ्याची बुद्धी मूढ आहे असे येथे म्हटले आहे. कारण त्याची बुद्धी योग्य मार्गाने चाललेली नाही.

जो बंधनातून सुटण्याची इच्छा करीत नाही तो स्वतःचा घात करून घेतो. प्राचीन काळी आत्मघात/आत्महत्या हे पाप आहे असे मानले जाई. तेव्हा बंधनातून सुटू न इच्छिणारा पापी होईल. ये थे आत्महत्या म्हणजे आत्म्याची हत्या नव्हे. कारण आत्मा/ब्रह्म अमर आहे. आत्मा शब्दाला संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहेत. तेव्हा आत्मघात म्हणजे देह, इंद्रिये इत्यादींचा दुरुपयोग असा अर्थ घेता येईल. येथे ''श्रुति-पार-दर्शन'' शब्दाने श्लोक २ मधील विद्वत्त्व अभिप्रेत आहे.
'असद्-ग्रह' या शब्दाचे पुढीलप्रमाणे अनेक अर्थ होऊ शकतील - (१) दुर्लभ नरजन्म, पुरुषजन्म, वेदविद्या इत्यादी मिळाले. आता आणि काही मिळावयाचे राहिले नाही. असे जर वाटू लागेल तर तो 'असद्-ग्रह' होईल. मोक्ष हे साध्य सोडून जर इतर गोष्टी पुरेशा वाटू लागल्या तर तो चुकीचा निर्णय आहे आणि अशा चुकीच्या समजांनी माणूस सन्मार्गावरून भ्रष्ट होऊ शकतो. (२) केवलाद्वैत वेदांताचे मत जग हे असत्/मिथ्या आहे. ते जग खरे आहे असे मानून जर माणूस जगातील विषयांत आसक्त झाला तर तोही 'असद्-ग्रहच 'आहे. कारण मग तो मोक्ष या ध्येयाचा विचारच करणार नाही. आत्म्याचा परमानंद सोडून जगातील क्षणिक सुखाची इच्छा ही असद्-ग्रह च आहे.

No comments:

Post a Comment