Friday, January 12, 2018

विवेकचूडामणि श्लोक १२ वा

विचाराने आत्मवस्तूची प्राप्ती कशी होते हे एक उदाहरण घेऊन पुढील श्लोक १२ सांगतो. 

सव्यग्र विचारतः सिद्धा रज्जु-तत्त्वावधारणा ।
भ्रांतोदित-महासर्प-भय-दुःख-विनाशिनी ॥ १२ ॥

योग्य विचार केल्याने रज्जूच्या खऱ्या स्वरूपाचा निश्चय होतो आणि भ्रांतीने त्या रज्जूवर भासणाऱ्या मोठ्या सर्पामुळे वाटणारे भय आणि दुःख नष्ट होऊन जाते.

या श्लोकात रज्जूसर्प दृष्टांत सांगितलेला आहे. केवलाद्वैत वेदांतात हा दृष्टांत वरचेवर येतो. तो असा - जमिनीवर एक लांब दोरी-रज्जू वेडीवाकडी पडलेली होती. अंधूक प्रकाशामुळे ती कुणालातरी रज्जू म्हणून कळली नाही. म्हणून तेथे रज्जू नसून साप आहे अशी - भ्रांती- चुकीचे ज्ञान - झाले. मग तो सर्प चावेल अशी भीती वाटली आणि मनात दुःख झाले. पण पुढे विचार केल्यावर तेथे रज्जू आहे असे कळले ते विचाराने. जर हा साप असता तर तो स्वस्थ न बसता हलला असता, त्याने फणा काढला असता, त्याने फूत्कार केला असता. पण येथे दिसणारा हा साप तसले काहीच करीत नाही आहे. तेव्हा येथे साप नाही. येथे सापासारखी वाटणारी रज्जू पडलेली दिसते. असा योग्य विचार केल्यावर येथे साप नसून रज्जूच पडलेली आहे असे रज्जूचे खरे स्वरूप कळून आले आणि मग रज्जूचे स्वरूप कळताच साप आहे असे वाटल्यामुळे निर्माण झालेली भीती आणि दुःख नष्ट होऊन गेले. याचप्रमाणे योग्य विचार केला तर आत्मवस्तूचे खरे स्वरूप कळून येते आणि आत्म्यावर भ्रांतीने भासणाऱ्या संसाराची भीती आणि संसारातील दुःख संपते.

No comments:

Post a Comment